पुणे : अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाचे दोन दिवसीय महाअधिवेशन पुण्यातील मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिप येथे उत्साहात झाले.
यात समाजातील जुन्या रूढी परंपरांमध्ये कालानुरूप आवश्यक असे बदल करण्याविषयीचे विविध ठराव एकमताने संमत करण्यात आले. महाअधिवेशनाचे अध्यक्ष कैलाश वाणी, खजिनदार श्यामकांत शेंडे, सहकार्याध्यक्ष अनिल चितोडकर, संयोजन समितीचे सदस्य श्यामकांत कोतकर, निलेश पुरकर आदी या वेळी उपस्थित होते. डॉ. बी. टी बधान, डॉ. जगदीश चिंचोरे, प्रा. उषा श्रीबागड, सचिन बागड यांनी या ठरावांचे वाचन केले आणि मोठ्या संख्येने उपस्थित समाजातील नागरीकांनी त्याला अनुमोदन दिले.
त्यातील प्रमुख ठराव हे विवाह व उत्तर कार्यासंबंधी होते. हे ठराव संमत झाल्यामुळे या प्रगतीशील समाजाने सामाजिक सुधारणांची कास धरली आहे. त्यातील काही प्रमुख ठरावांनुसार यापुढे उपवर किंवा उपवधू या दोघांकडूनही लग्नाचे प्रस्ताव देण्यात येतील. याआधी फक्त मुलींकडून हे प्रस्ताव दिले जायचे. साखरपुडा व इतर शिष्टाचार एकाच दिवशी व एकाच ठिकाणी पार पाडावेत, जे शक्यतो वर पक्षाकडे करण्यात यावेत. याशिवाय विवाहाचा खर्च हा वधू आणि वर पक्षाने समसमान करावा. कोणत्याही स्वरूपात हुंडा देण्यात किंवा घेण्यात येऊ नये, यांसारखे प्रस्ताव या वेळी संमत करण्यात आले. महाअधिवेशनामध्ये झालेल्या सत्रात हणमंतराव गायकवाड व शांतीलाल मुथा यांची मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात आली.
या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी लाडशाखीय वाणी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे आणि नाशिक शहरात वसतिगृहाची उभारणी करण्यासाठी सरकारने जागा द्यावी त्याच्या बांधकामासाठी लागणारा निधी आमचा समाज उपलब्ध करून देईल, अशी मागणी समाजातर्फे कैलाश वाणी यांनी फडणवीस यांच्याकडे केली.
याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, बऱ्याचदा विविध समाजाची लोकं आमच्याकडे येतात, ते जागेबरोबरच निधीची देखील मागणी करतात; पण तुम्ही मात्र वेगळे आहात हो. तुम्ही फक्त जागा मागताय याबरोबरच समाजाच्या विकासासाठी एक पाउल पुढे टाकताय ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो की, लाडशाखीय वाणी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या या वसतिगृहांसाठी लागणारी जागा ही सरकारतर्फे लवकरच पुणे व नाशिक येथे उपलब्ध करून देण्यात येईल.’
या प्रसंगी राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री गिरीश बापट, आमदार मेधा कुलकर्णी यांसह वाणी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्र्यांनी समाजातर्फे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, तसेच व्यापाराच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला दिलेली बळकटी यासाठी समाजाचे विशेष कौतुक केले; तसेच हा समाज नोकऱ्या मागणारा नाही, तर देणारा आहे, असे सांगत या कर्मयोगी समाजाच्या पाठीशी सरकार कायमच असेल, असे आवर्जून नमूद केले. या प्रसंगी घोषणा झालेल्या ‘वाणी चेंबर ऑफ कॉमर्स’ या लाडशाखीय वाणी समाजाच्या प्राचीन व अर्वाचीन पुराव्यांचे पुस्तक असलेल्या ‘समाजमंथन’ या पुस्तिकेचे प्रकाशन फडणवीस यांनी केले.
समाजातर्फे मुख्यमंत्री निधीसाठी ११ लाख रुपयांची मदत करण्यात आली. याबरोबरच वाणी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने २५ गावांतील ३०० विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांचे शैक्षणिक पालकत्व घेणार असल्याची माहितीही देण्यात आली.
पहिल्या दिवशीच्या समारोप सत्राला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थिती लावली.
‘स्वकर्तृत्त्व, जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणा या जोरावर समाजाने आपला विकास साधला आणि इतर समाजांसमोर आदर्श ठेवला,’ अशा शब्दांत विखे पाटील यांनी कौतुक केले. ‘मुख्यमंत्र्यानी लाडशाखीय वाणी समाजाला पुणे आणि नाशिक येथे वसतिगृहांसाठी जागा देण्याविषयी आश्वस्त केले असले, तरी या आश्वासनाची पूर्तता होण्यासाठी आम्ही नक्कीच पाठपुरावा करू,’ असे ही त्यांनी या वेळी सांगितले.
मुंडे म्हणाले, ‘सध्याच्या सरकारने असंख्य आश्वासनांची पूर्तता केलेली नाही; परंतु या पूर्तता न झालेल्या आश्वासनांमध्ये वाणी समाजाच्या या विद्यार्थी वसतिगृहांची भर पडू नये, यासाठी आम्ही देखील प्रयत्न करू.’
लाडशाखीय वाणी समाजाच्या दोन दिवसीय महाअधिवेशनाचा समारोप जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत झाला. या दोन दिवसीय अधिवेशनात स्वत:च्या विकासाबरोबरच समाजाचा विकास कशा पद्धतीने करता येईल यावर अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन देखील करण्यात आले होते.
समारोप सत्रात बोलताना भामरे यांनी लाडशाखीय वाणी समाजाच्या उद्योजकतेचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून छोट्या उद्योजकांना घडविण्यावर भर देण्याला सुरुवात केली आहे; मात्र मला अभिमानाने सांगावेसे वाटते की, लाडशाखीय वाणी समाजाने या पद्धतीचा अवलंब गेल्या कित्येक वर्षांपूर्वी केला असून, विविध स्तरावर उद्योजक घडविले आहेत.’
यानंतर महाअधिवेशनाचे कार्याध्यक्ष कैलाश वाणी यांनी समाजाची संख्या कमी असल्याने राजकीय प्रतिनिधित्व नसल्याची खंत व्यक्त केली. त्यावर महाजन म्हणाले, ‘राजकारणात येण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी पैसा किंवा आपल्या समाजाची संख्या या दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात असे नाही. त्यासाठी लागते ती प्रामाणिकपणे समाजकार्य करण्याची जिद्द. तुमच्या समाजाचे निस्वार्थीपणे समाजकार्य करणाची भावना असणारे चार तरुण मला द्या. त्यांना योग्य पद्धतीने प्रशिक्षण देऊन राजकारणात उतरण्यासाठी मी सक्षम बनवेन.’
या दोन दिवसीय लाडशाखीय वाणी समाजाच्या महाअधिवेशनासाठी राज्यभरातून समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.